मुंबई : प्रतिनिधी
भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकते, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या टीकेत तथ्य असल्याचा प्रत्यत अकोला जिल्ह्यात आहे. नुकताच नगपपंचायत आणि नगपालिका निवडणूक झाली. अकोट नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले नाही. मात्र, सत्तेत येण्यासाठी त्यांनी चक्क असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती केली आहे.
भाजपच्या नेतृत्वात अकोट विकास मंच स्थापन करण्यात आला आहे. भाजपने अकोट नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक ११ जागा जिंकल्या मात्र, ३५ जागा असलेल्या नगरपंचायतीमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता मिळाली नाही. त्यामुळे विरोधी पक्षात सर्वाधिक पाच जागा जिंकलेल्या एमआयएमला अकोट विकास मंचात घेत सत्तेवर दावा सांगितला.
विशेष म्हणजे या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंच्या प्रहारचा देखील समावेश आहे. या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीतील सर्व पक्षांना भाजपचा व्हिपचे पालन करावे लागणार आहे.
भाजपचे आमदार रवी ठाकूर हे या आघाडीचे गटनेते असणार आहे. २४ जानेवारीला उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रित मतदान करणार आहे. माया धुळे या नगराध्यक्ष असून नगपालिकेत विरोधी पक्षात काँग्रेस सहा सदस्य आणि वंचितचे दोन सदस्य असणार आहे.
अकोट नगरपंचायतीमध्ये ३५ जागा आहेत. त्यातील दोन जागा रिक्त असून ३३ जागांवर निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपला सर्वाधिक ११, काँग्रेसला ५, एमआयएम ५, शिंदेंची शिवसेना १, ठाकरेंची शिवसेना २, अजित पवारांची राष्ट्रवादी २, शरद पवारांची राष्ट्रवादी दोन आणि प्रहारचे तीन सदस्य आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या माया धुळे या विजयी झाला आहे.

