लातूर : प्रतिनिधी
जागतिक कामगार दिनाचे औचित्या साधून अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने ३ मे रोजी सकाळी ११ वाजता येथील दयानंद कॉलेज सभागृहात लातूर जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून नवीन चार कायदे केले आहेत. या कायद्याचे कामगारांवर काय विपरीत परिणाम होणार आहे. केंद्र व राज्य सरकारची कामगार विषयक भूमिका, जिल्हा व राज्य पातळीवरील कामगारांच्या प्रश्नांची चर्चा करून या मेळाव्यात ठराव करण्यात येणार आहेत.
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी केरळचे माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष तथा पुणे मनपाचे नगरसेवक सुनील शिंदे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मंगलताई शिंदे यांच्या अध्यक्तेखाली हा मेळावा होणार आहे. तर भटक्या विमुक्तांचे नेते प्रा. सुधीर अनवले, बसवंतअप्पा उबाळे, इंजि. शेख शफी बाशासाब आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कामगार मेळाव्यास लातूर जिल्ह्यातील विविध उद्योगातील कामगार, कर्मचारी, बांधकाम कामगार, माथाडी कामगार, खाजगी सुरक्षा रक्षक घरेलू कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे सचिव शिवाजी भंडारे, उपाध्यक्ष सुरेश काटे, कार्यकारिणी सदस्य प्रमोद बानाटे, नूतन अंगरखे, महेंद्र कांबळे, अंकुश टकळगे, नेताजी बनसोड, चंद्रपाल गिरी, अंजली येदले, किशोर सगर, भागवत पांचाळ, बळीराम कांबळे, मन्मथ वचे, बालाजी हणमंते, मनोहर कसबे, अनिता काकरे, राजाभाऊ पाटनुरे, मारोती झाकणे, मुखतार शेख, समाधान माने, सचिन कांबळे, विकास मोरे, बळीराम शिंदे, अण्णाराव सूर्यवंशी आदींनी केले आहे.

