चेन्नई : वृत्तसंस्था
नुकत्याच झालेल्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारली. निकालांनंतर टीव्हीके सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. मात्र बहुमताने हुलकावणी दिल्याने विजय यांच्या सत्तास्थापनेच्या मार्गात काही अडथळे आले होते. मात्र त्यावर मात करत विजय यांनी काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांच्या साथीने बहुमताची जुळवाजुळव करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण काठावरचं बहुमत असताना विजय हे कसा कारभार करू शकतील, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात होता. मात्र आता विजय आणि त्यांच्या पक्षाला मोठा दिलासा देणारी घटना तामिळनाडूच्या राजकारणात घडली आहे. तामिळनाडूमधील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या अण्णा द्रमुक पक्षातील एका गटाने विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अण्णा द्रमुक पक्षात मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्यावरून आमदारांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यातील षण्मुगम गटाने विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत अण्णा द्रमुकचे नेते सी. व्ही. ष्णमुगम यांनी सांगितले की, आम्ही या निवडणुकीत विजयी झालेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जर आम्ही डीएमकेसोबत आघाडी केली असती तर एआयडीएमकेचे अस्तित्वच संपुष्टात आले असते. सध्या आम्ही कुठल्याही आघाडीविना उभे आहोत. तसेच आमच्या पक्षाला पुन्हा एकदा भक्कम बनवण्यावर आमचे लक्ष आहे. त्यामुळे आम्ही टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी डीएमकेसोबतच्या आघाडीबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना षण्मुगम यांनी सांगितले की, आम्ही अण्णा द्रमुक पक्षाची स्थापना ही डीएमकेच्या विरोधात केली होती. गेल्या ५३ वर्षांपासून आमचे राजकारण हे डीएमकेच्या विरोधात राहिलेले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर डीएमकेच्या पाठिंब्याने अण्णा द्रमुकचे सरकार स्थापन करण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र आमच्या बहुतांश सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि त्याला विरोध केला, असे त्यांनी सांगितले.
अण्णा द्रमुक पक्षाने एनडीएच्या माध्यमातून भाजपा आणि इतर छोट्या पक्षांसह मिळून तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र टीव्हीकेच्या लाटेत अण्णा द्रमुकचा दारुण पराभव झाला. तसेच पक्षाला केवळ ४७ जागाच मिळाल्या आणि पक्ष तिस-या क्रमांकावर फेकला गेला.
















