कुटुंबीयांसह नवदाम्पत्य जात होते तुळजापूरला
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातांत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. लग्नानंतर देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या नवदाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.
बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने दुर्दैवी घटना घडली. पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर मालट्रक आणि कारचा समोरासमोर अपघात झाला. यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमारे यांच्यासह आणखी एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ४ दिवसांपूर्वीच लग्न झालेले अनिकेत गौतम कांबळे, मेघना अनिकेत कांबळे हे नवविवाहित तरुण-तरुणी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी नवविवाहित दाम्पत्यला बार्शीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार २६ नोव्हेंबर रोजी अनिकेत आणि मेघना या दोघांचा विवाह झाला होता. त्यामुळे या दोघांना घेऊन कुटुंबीय देवदर्शनसाठी तुळजापूरला निघाले होते. मात्र, अचानक कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.

