राज्यात मोठ्या घडामोडी, नंदनवन बंगल्यावर एक तास खलबते
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एवढेच नव्हे तर तब्बल १ तास चर्चा केली. मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामध्ये शरद पवार गटाची सत्तेत सहभागी होऊन अर्थ मंत्रिपदासाठीचा तर खटाटोप सुरू नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाने सत्तेसोबत जाण्याचा कायम इन्कार केला आहे.
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन निवासस्थानी जाऊन तब्बल एक तास चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दलच्या अनेक चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने सर्व काही सत्तेसाठीच सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या आधी शरद पवार यांनी ३० वर्षांनंतर प्रथमच विधानभवनात जात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाणे आणि तिथे शिंदे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारणे, त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे आणि त्यांच्यासमवेत अजित पवार गटाचे नेते उपस्थित राहणे, त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणे आणि या गाठीभेटी सुरू असतानाच आज जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एक तास खलबते करणे यावरून राज्यात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तब्बल १ तास खलबते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये तब्बल एक तास खलबते झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नंदनवन निवासस्थानी नेमकी काय चर्चा सुरु आहे, याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. परंतु या गाठीभेटीमुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.
फडणवीस दिल्लीत,
पुन्हा शिंदेंकडे धुरा?
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविली जाऊ शकते. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटही राज्य मंत्रिमंडळात सामिल होऊन राज्याचे अर्थखाते पदरात पाडून घेऊ शकतो, अशीही चर्चा रंगली आहे. त्यादृष्टीने तर हालचाली सुरू नाहीत ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
















