उदगीर : प्रतिनिधी
ज्यांच्याकडे विचार आहे, अशा व्यक्तींनी व्यक्त व्हायचे असते मात्र सध्या ज्याच्याकडे विचारच नाही, अशा व्यक्ती समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्यामुळे सामाजिक प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. संजय कळमकर यांनी केले. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्य लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय संजय कळमकर, प्रसिद्ध उद्योजक व्यंकट कुलकर्णी हे होते. अध्यक्षस्थानी संतोष कुलकर्णी हे होते.
संजय कळमकर म्हणाले की, जग आनंदीच आहे फक्त आपली त्याकडे पाहण्याची दृष्टी पाहिजे .मानसिक तणाव आपण स्वत: होऊन ओढवून घेतला आहे. मुले अनोळखी चेह-याने घरी येतात त्यांच्याशी पालकांचा संवादच होत नाही. त्याच्याशी बोला, त्याच्याशी गप्पा मारा. आनंद वाटल्याने आनंद वाढतो मात्र आम्हाला दु:ख वाटायची सवय लागली आहे. दु:ख सुध्दा देखणे करण्याची वृत्ती वाढली आहे. आमच्यात द्वेष तिरस्कार वाढला आहे. प्रेम कमी झाले आहे. नाते संबंध टिकविले जात नाहीत यामुळे व्यक्ती अस्वस्थ आहे. यासाठी वाईट गोष्टी, नावडत्या घटना, व्यक्ती यांची आठवण डोळ्यासमोर आणण्याऐवजी चांगल्या गोष्टी , आवडत्या घटना, व्यक्ती सतत डोळ्यासमोर ठेवा., प्रत्येक घटनेकडे सकारात्मकपणे बघण्याची दृष्टी आपल्याकडे असेल तर आनंदाच्या वाटा मोकळ्या होतात. आभासी दुनियेत राहण्यापेक्षा वाचन वाढवा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात संतोष कुलकर्णी यांनी राजकीय नेत्याच्या वाढत्या अपप्रवृत्तींना निवडून देणारे आपण मतदारच जबाबदार असल्याचे सांगितले. कामापेक्षा प्रसिद्धीची आणि दिखाव्याचा हव्यास वाढल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्तविक ऋषिकेश द्वैयांपयन यांनी केले. प्रमोद राजूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता गोपाळ जोशी यांनी गायलेल्या पसायदानाने झाली .
प्रा. सुरज पोस्ते यांनी प्रसाद वाटपाची व्यवस्था केली होती. या वेळी परशुराम जन्मोत्सव समिती अध्यक्ष श्रीपाद करंजीकर, उपाध्यक्ष नरेंद्र घनपाठी, दिनेश देशमुख, प्रमोद राजूरकर, पांडुरंग कुलकर्णी, संदीप नळगीरकर, विक्रम हलकीकर, व्यास द्वैयपायन, आदित्य कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, विवेक कुलकर्णी, सावन टाकंसाळे, मुरलीधर जोशी, अंबादास कुलकर्णी, व्ही एस कुलकर्णी, मयूर कुलकर्णी, उषा कुलकर्णी, मंजुषा कुलकर्णी, सुनिती दंडवते, अंबिका घनपाठी, मयुरी मध्वरे, तुलसी देशमुख, गंगा पांडे, वैभवी पटवारी, पल्लवी महाजन, अपर्णा पटवारी, अनिता कुलकर्णी, सारिका धाराशिवकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
















