सर्वपक्षीय खासदार पाकचा खरा चेहरा उघड करणार
प्रतिनिधीमंडळ लवकरच
विदेश दौ-यावर जाणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी लष्कराचे आणि गुप्तहेर संघटना आयएसआयचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पाकिस्तान अडचणीत आला. आता पाकिस्तानने एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नुकसान भरपाई जाहीर केली. या सगळ््यावरून पाकिस्तानची दहशतवादपूरक भूमिका जगासमोर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली.
काँग्रेस पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेणारे खासदार शशी थरुर यांना केंद्र सरकारकडून महत्त्वाची भूमिका दिली जाण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर थरुर यांनी घेतलेली भूमिका पक्षापेक्षा वेगळी आहे. त्याच थरुर यांना केंद्र सरकार महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे. थरुर यांच्यासोबतच ठाकरेसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनाकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार परराष्ट्र धोरणांच्या संसदीय समितीचे प्रमुख असलेल्या शशी थरुर यांच्याकडे बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व सोपविले जाऊ शकते. त्यासाठी सरकारने थरुर यांच्याशी संपर्क साधला आहे. या संदर्भात थरुर सकारात्मक आहेत. परराष्ट्र धोरणांच्या स्थायी समितीचे ते अध्यक्ष आहेत. यासंदर्भात आपण काँग्रेस पक्षाचा सल्ला घेऊ, असे थरूर यांनी कळविले आहे.
लवकरच प्रतिनिधी
मंडळ तयार करणार
मोदी सरकार अनेक प्रतिनिधी मंडळं तयार करण्याच्या तयारीत आहे. खासदारांची ही पथके परदेश दौरे करतील आणि दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानची पोलखोल करतील. एका पथकात ५ ते सहा खासदार असण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्रालयाचा एक प्रतिनिधी आणि एक सरकारी अधिकारीही असेल. परदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि पासपोर्ट तयार ठेवण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.
२२ मेपासून विदेश दौरा?
खासदारांचे पथक २२ मेच्या आसपास विदेशात रवाना होऊ शकते. ३ ते ४ जूनपर्यंत पथक मायदेशी परतेल. पथकात विविध पक्षांचे खासदार असतील. काँग्रेसचे मनिष तिवारी, अमर सिंह, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, भाजपचे समिक भट्टाचार्य, बीजेडीचे सस्मित पात्रा, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही खासदारांचा पथकात समावेश असेल.