पुणे : प्रतिनिधी
शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज यांना यंदाचा ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदा ३१ वे वर्ष आहे.‘जनकल्याण समिती’चे कार्यवाह राजन गो-हे यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अनुसंधान क्षेत्रासाठीचा पुरस्कार लाड यांना आणि समाजप्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार भारतभूषणदास महाराज यांना प्रदान केला जाईल, उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे प्रमुख वक्ते आहेत.
‘जनकल्याण समिती’तर्फे महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पूर्वांचल विकास, दिव्यांग कल्याण या पाच प्रमुख क्षेत्रात १७ मोठे सेवा प्रकल्प चालवले जात आहेत. आठ शहरांमध्ये पूर्वांचल वसतिगृह प्रकल्प, सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, सिकल सेल आणि थॅलेसेमिया प्रकल्प, दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच तीन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदी सेवाकार्यांचा समावेश आहे.

