कांदा उत्पादकांना मिळणार दिलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेश सरकारने ७ डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय कांदा निर्यातदारांना दिलासा मिळू शकतो. देशांतर्गत बाजार स्थिर ठेवण्यासाठी बांगलादेशने रोज ५० आयात परवाने देण्याची घोषणा केली. आता प्रत्येक परवान्यानुसार ३० टन कांदा आयात करता येणार आहे.
या निर्णयाचा थेट फायदा भारताच्या कांदा निर्यात क्षेत्राला होणार आहे, असे व्यापार मंडळाचे मत आहे. बांगलादेश हा भारताचा परंपरागत व मोठा कांदा आयातदार देश आहे. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशात कांद्याची आयात बंद असल्याने महाराष्ट्रातील नाशिक, लासलगाव, पिंपळगावासह आशियातील सर्वांत मोठ्या कांदा बाजारांवर त्याचा परिणाम दिसून येत होता. आता निर्यातीचा मार्ग खुला होताच भारतीय कांदा व्यापाराला आणि दर स्थिरतेला आधार मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता मर्यादित आयात परवाने मिळूनही बांगलादेशाकडून मागणी वाढेल, यामुळे सध्या घटलेल्या कांदा दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. बाजार स्थिती पाहून पुढील आदेशापर्यंत नियंत्रित पद्धतीने कांदा आयात प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले.

