जयपूर : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीतील निर्णयानंतर राजस्थानच्या उच्च न्यायालयाने देखील भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थान हायकोर्टाने देखील भटक्या कुत्र्यांमुळे आणि पशुंमुळे वाढत चाललेल्या धोक्यावर स्वत: दखल घेत हे निर्देश जारी केले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात विशेषकरून मुंबई, पुण्यासारख्या शहरांत अशाप्रकारचे आदेश जारी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या आणि इतर प्राण्यांच्या वाढत्या धोक्याची स्वत:हून दखल घेतली. बातम्यांची दखल घेत सरकारला ऍमिकस क्युरीच्या अहवालावर उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. न्यायमूर्ती कुलदीप माथूर आणि न्यायमूर्ती रवी चिरानिया यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील डॉ. सचिन आचार्य, वकील प्रियंका बोराणा आणि वकील हेली पाठक यांनी आपली बाजू मांडली.
धक्कादायक बाब म्हणजे एम्स जोधपूरने प्रियंका बोराना यांनी आपल्या कर्मचा-यांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याचे पत्र लिहून कळविले होते. याविषयीच्या बातम्यांची अखेर कोर्टाने याची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले आहेत. शहरातील रस्त्यांवरून भटके कुत्रे आणि इतर प्राणी हटविण्यासाठी मोहिम सुरु करण्यास सांगतिले आहे. तसेच कामात अडथळा आणणा-यांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार एफआयआर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

