नागपूर : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या खास मुलाखतीत सध्याच्या राजकीय प्रवाहांवर स्पष्ट आणि परखड भाष्य करत आयाराम-गयाराम संस्कृतीवर अचूक निशाणा साधला आहे. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश होत असून, आयाराम-गयारामांची सत्ताधा-यांकडे झुकण्याची ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका गडकरी यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षांत इतर पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश झाले असल्याचे निरीक्षण गडकरींनी नोंदवले. राज्यागणिक प्रदेशाध्यक्षांमध्ये पक्षप्रवेशांची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र असल्याचेही त्यांनी सूचित केले. मात्र, या वाढत्या प्रवेशांमागील हेतू आणि निष्ठेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आयाराम-गयाराम प्रवृत्तीवर थेट बोट ठेवले. सत्ताधा-यांकडे झुकण्याची ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक असल्याचे सूचक विधान करत, त्यांनी या प्रवाहाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. गडकरींच्या या वक्तव्याने भाजपसह इतर पक्षांतीलही ‘पक्षांतर’ संस्कृतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
या मुलाखतीत गडकरींनी आपली वैयक्तिक बाजू आणि नागपूरशी असलेली भावनिक नाळही उलगडली. नागपूरची जनता हा माझा परिवार आहे, असे सांगत त्यांनी शहराबद्दलचा अभिमान व्यक्त केला.
नागपूरच्या विकासाचे मोठे व्हिजन
गडचिरोलीसारखा आर्थिकदृष्ट्या मागास जिल्हा आणि आदिवासीबहुल भागात उद्योग सुरू होत असल्याचे सांगत गडकरींनी विदर्भाच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडला. नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करत त्यांनी शहराला जागतिक नकाशावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

