किल्लारी : वार्ताहर
औराद पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात तपास, सक्षम पुरावे व प्रभावी न्यायालयीन पैरवीमुळे आरोपीस तीन वर्षे सक्त कारावास व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदरील सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (निलंगा) सौ. ए. एस. गुंजवटे यांच्या न्यायालयात झाली.
सदर प्रकरणात फिर्यादी या त्यांच्या मावशीच्या अंत्यविधीसाठी औराद शहाजनी येथे आल्या होत्या. दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी सुमारे २.१० वाजता विरुपाक्षेश्वर मठाजवळून पायी जात असताना, एका अज्ञात इसमाने क्रमांक नसलेल्या दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे व अंदाजे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले होते. याप्रकरणी पोलिस ठाणे औराद शहाजनी गुरनं. ५२/२०२३ अन्वये भादंवि कलम ३९२ व २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जी. टी. शिंदे यांनी करून आरोपी सागर उर्फ टिल्लू भगवान सोनवणे (रा. पटेल नगर, लातूर) याच्याविरुद्ध भक्कम पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, निलंगा, सौ. ए. एस. गुंजवटे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता व्ही. एन. मेहेत्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे ग्रा धरून आरोपीस भादंवि कलम ३९२ अंतर्गत तीन वर्षे सक्त कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५७ (३) अन्वये दंडापैकी ३, हजार नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर भादंवि कलम २०१ मधून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, फौ.प्र.सं. कलम ४२८ अन्वये आरोपीने अटकेत घालविलेले १५० दिवस शिक्षेच्या कालावधीत समायोजित करण्यात येणार आहेत. सदर प्रकरणात प्रभावी तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक जी. टी. शिंदे, न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अंमलदार बी. एस. माने, कोर्ट समन्वय अधिकारी स.पो.नि. एस. बी. वाघमारे तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी एच. पी. बांगर यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
















