तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने घटणार
पुणे : प्रतिनिधी
उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने तो भाग गारठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ४८ तासांत थंडीचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारताचे कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसवर आहे. त्यात वेगाने घट होत आहे. किमान तापमान २ ते ४ अंशाने घटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पाऊस ५ नोव्हेंबरपासून पूर्ण थांबल्याने आगामी ४८ ते ७२ तासांत थंडीचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यातच शुक्रवारीच थंडीची चाहुल लागली असून, दिवसभरापासून काही अंशी वातावरणात गारवा जाणवत आहे. रात्रीही थंडी वाढल्याचे जाणवले. त्यामुळे उद्या यात आणखी भर पडू शकते.
दरम्यान, राज्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री हवेत गारवा असे चित्र पाहायला मिळाले. गेल्या २४ तासांत वातावरणात सौम्य बदल झाला आहे. कमाल तापमान २८.६ अंश तर किमान तापमान २०. २ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळी हलका गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर उष्णता होती. त्यानंतर रात्री हवेत गारवा निर्माण झाला. त्यातच गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी गारठा अधिक वाढला आहे. त्यामुळे आता अडगळीत पडलेले उबदार कपडे बाहेर काढले जात आहेत.

