नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरकारी नोकरीतील आरक्षण अधिक समतोल करण्यासाठी आर्थिक निकषांचा समावेश असलेल्या धोरणांची आखणी करावी, अशी मागणी एका जनहित याचिकेत करण्यात आली आहे. यावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने केंद्राला नोटीस बजावली आणि रमाशंकर प्रजापती आणि यमुना प्रसाद यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागितले.
विधिज्ञ संदीप सिंह यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे की, या दृष्टिकोनामुळे संविधानाच्या कलम १४, १५ आणि १६ ला बळकटी मिळेल आणि विद्यमान कोट्यात बदल न करता समान संधी मिळेल.
याचिकेत म्हटले आहे की, अनुसूचित जाती (एससी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) श्रेणीतील याचिकाकर्ते या समुदायांमधील आर्थिक असमानता अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण हे सुरुवातीला वंचित समुदायांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आले होते. सध्याची व्यवस्था या गटांमधील तुलनेने संपन्न आर्थिक स्तर आणि उच्च सामाजिक दर्जाच्या पार्श्वभूमीतील लोकांना अप्रमाणितपणे लाभ देते.
आर्थिकदृष्ट्या वंचित सदस्यांना संधींचा मर्यादित लाभ मिळतो, असेही यात म्हटले आहे. ७५ वर्षांत आरक्षणामुळे राखीव श्रेणींमध्ये काही निवडक लोकांनाच फायदा झाला आहे. ज्यामुळे समुदायांतर्गत आर्थिक असमानता निर्माण झाली आहे, असेही म्हटले आहे.

