लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यामध्ये लातूर पंचायत समितीच्या २० गणासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन १९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले, तर १०१ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली असता ९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले, तर ६३ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र परत घेण्यासाठी मंगळवार दि. २७ जानेवारी हा शेवटचा दिवस असणार आहे. उद्या लातूर तालुक्यातील १० गटांसाठी व २० गणांसाठीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
लातूर जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांवर २१ मार्च २०२२ पासून आज पर्यंत म्हणजेच जवळपास ३ वर्ष १० महिने शासन नियुक्त प्रशासक राज सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी व ११८ पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्याने प्रशासकाचा कार्यकाळ आता औटघटकेचा ठरणार आहे. या निवडणूकीची प्रत्येक पक्षांच्या उमेदवारांनी गेल्या कांही दिवसापासून नागरीकांच्या गाठीभेटी घेत तयारी केली आहे. अनेक इच्छूक उमेदवारांनी आपले नशिब आजमावण्यासाठी लातूर तालुक्यातील निवडणूक विभागाकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
लातूर तालुक्यामध्ये लातूर पंचायत समितीच्या २० गणासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली असता १९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले, तर १०१ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली असता ९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहेत. तर ६३ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. अनेक उमेदवारांनी दोन-दोन नामनिर्देशन पत्र भरले आहेत. ज्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र परत घ्यायचे आहेत. त्यांच्यासाठी उद्याचा दिवस शेवटचा असणार आहे. त्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
५ फेब्रुवारीला मतदान
लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी व १० पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहिर झाली असून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. या नामनिर्देशनपत्रांची छाननीही झाली आहे. मंगळवार २७ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्र परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ५ फेब्रुवारी रोजी लातूर जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी व लातूर पंचायत समितीच्या २० गणांसाठी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
उमेदवारांचा एक राऊंड पूर्ण
लातूर तालुक्यामध्ये लातूर पंचायत समिती गट व गणासाठी निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना प्रचारासाठी कालावधी कमी असल्याने उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या पूर्वीच मतदारांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारांनी एक राऊंड पूर्ण केला आहे. तसेच दुस-या राऊंडमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली, देवदर्शन करून प्रचाराचा शुभारंभ होत आसल्याने प्रचाराला आणखी गती येत आहे. उमेदवारांच्या बरोबरच कार्यकर्तेही निवडणूकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत.

