लातूर : प्रतिनिधी
कायद्याचा धाक निर्माण करणे आणि नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र ही जबाबदारी केवळ गुन्हा घडल्यानंतर तपास करण्यापुरती मर्यादित नसून, नागरिकांना तात्काळ मदत करणे, नुकसान टाळणे आणि गुन्हेगारांपर्यंत वेगाने पोहोचणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. याच कर्तव्यदक्षतेचे आणि कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण विवेकानंद चौक पोलीस ठाण्याने अवघ्या काही तासांच्या कालावधीत दिले आहे. एका बाजूला १४ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा उलगडा करून महिला आरोपीला अटक करण्यात आली, तर दुस-या बाजूला चोरीस नेण्यात आलेल्या तीन बैलांचा गुन्हा नोंद होण्यापूर्वीच शोध घेऊन शेतक-याला दिलासा देण्यात आला. पहिल्या घटनेत, एलआयसी कॉलनी परिसरातील फिर्यादीच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने अंदाजे ९ तोळे ९ ग्रॅम वजनाचे, सुमारे १४ लाख ४८ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरी केली होती. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजितसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला तपासासाठी नियुक्त केले. गुप्त माहितीदार, तांत्रिक विश्लेषण आणि शास्त्रीय तपासाच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान शामल मोहन राठोड (वय ४० वर्षे, रा. कन्हेरी तांडा, ता. जि. लातूर) हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ९ तोळे ४ ग्रॅम वजनाचे, सुमारे १३ लाख ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दुस-या घटनेत, सारोळा येथील शेतकरी विभीषण संपती बनसोडे यांच्या शेतातून मध्यरात्री तीन बैल चोरीस नेण्यात आले होते. शेजारील नातेवाईकाने बैल ओरडत असल्याची माहिती दिल्यानंतर मालकाने डायल ११२ वर संपर्क साधला. माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार त्रिंबकेश्वर अनिल विरकर आणि दीपक आबाजी सोनकांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात परिसरातील शेतशिवार, बांध आणि रस्त्यांवर कसून शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील एका शेताच्या बांधावर अंधारात बांधून ठेवलेले तीनही बैल पोलिसांना आढळून आले. त्यानंतर बैलांची ओळख पटवून ते शेतकरी विभीषण बनसोडे यांच्या ताब्यात देण्यात आले. या तत्पर कारवाईमुळे शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान टळले.
सदर दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजितसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात पार पडल्या. दोन्ही चोरी प्रकरणाच्या तपासात सहाय्यक फौजदार आर. एन. गोंदकर, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे, राणवीर देशमुख योगेश गायकवाड, सचिन राठोड, त्रिंबकेश्वर विरकर, दीपक सोनकांबळे यांनी दाखविलेली तत्परता उल्लेखनीय ठरली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आणि गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दल कटिबद्ध असून, विवेकानंद चौक पोलिसांच्या या दुहेरी यशस्वी कामगिरीमुळे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.
…………..
















