जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, आतापर्यंत तब्बल ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत असून, तालुक्यातील केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.
मतदार यादी पुनरिक्षणाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी वेळोवेळी आढावा बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देऊन घरोघरी भेट देणा-या बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत तालुक्यातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत फॉर्म भरण्यास सहकार्य केले. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया मानली जाते. प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज भरून घेणे अशी जबाबदारी बीएलओंनी पार पाडली. विशेष म्हणजे, या कालावधीत बहुतांश शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असतानाही बीएलओंनी समन्वय साधत काम प्रभावीपणे पूर्ण
केले.
तालुक्यात ३० जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जळकोट तालुक्यात सुमारे ७३ हजार मतदार असून, त्यासाठी ८७ केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यात आले आहेत. एसआयआर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी, नायब तहसीलदार रंगनाथ कराड, सहाय्यक गटविकास अधिकारी रोहित देडगे, मुख्याधिकारी रोहित आरबोळे, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील आणि गटशिक्षणाधिकारी रश्मिता साहू यांनी वेळोवेळी आढावा घेतला. बीएलओ पर्यवेक्षक एस. बी. तिडके, सचिन काडवादे, एम. एस. पाटील, एम. व्ही. हंगरगे, के. पी. बिरादार, बालाजी काटे आणि व्यंकट आंदे यांनी बीएलओंच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवले. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे अलीम शेख, शेख आर. पी. तसेच इतर कर्मचा-यांनीही बीएलओंच्या अडचणी तातडीने सोडवत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडली.
















