मुंबई : प्रतिनिधी
लालपरी अर्थात एसटी बस सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या सोयीसाठी वर्षातील बाराही महिने एसटी महामंडळाकडून सेवा दिली जाते. मात्र, आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या मागण्यांसाठी एसटी प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेकडून केला जाण्याची शक्यता आहे. या संपाचा फटका राज्यातील लाखो प्रवाशांना बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवा शक्ती एसटी कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
७७ लाख रुपये उत्पन्न
वेतन, भत्ते, सातवा वेतन आयोग आणि दिवाळी बोनस यांसह विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा २८ सप्टेंबरपासून ‘आक्रमक आंदोलन’ आणि १ ऑक्टोबरपासून मुंबईतील मुख्यालयासमोर सर्व स्तरांवरील कर्मचारी उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.
२ ऑक्टोबरपासून मुख्यालयासमोर धरणे
एसटी मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. २८ सप्टेंबरपासून आक्रमक आंदोलन सुरू होणार असून, १ ऑक्टोबरपासून मुंबईतील मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
एसटी कर्मचारी संघटनेच्या मागण्या काय?
रिक्त पदांवर नवीन भरती करावी, खासगी बस घेऊ नयेत, राज्य परिवहन महामंडळाच्या स्वत:च्या बस वापराव्यात. महागाई भत्ता राज्य कर्मचा-यांप्रमाणे द्यावा. २०१५ पासून जी प्रवास भाडेवाढ झाली आहे त्याची पूर्वलक्षीपणे पूर्तता करावी. याशिवाय, सेवानिवृत्त कर्मचा-यांना एकरकमी लाभ द्यावा, यांसह अशा विविध मागण्या आहेत.
गणेशोत्सव काळात एसटीच्या उत्पन्नात वाढ
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजारपेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातून एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. आपापल्या गावी, वाड्या-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक, त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक-अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
















