ठाकरे सेनेच्या बंडखोर ६ पैकी २ खासदारांची स्वाक्षरी नाही?
ठाकरेंच्या खासदारांची आज बैठक, व्हीप जारी, बैठकीत चित्र स्पष्ट होणार
ऑपरेशन टायगरमुळे
राज्यात संतापाची लाट
दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना पक्षाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असताना शिवसेनेत आणखी एक फूट पडली आहे. ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून स्वतंत्र गट स्थापन केल्याची व त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची चर्चा सुरू असतानाच धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व मुंबईतील संजय दिना पाटील या बंडात सहभागी आहेत की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. दोन्ही गटाकडून याबाबत कोणीही अधिकृतपणे सांगण्यास तयार नाही. त्यातच या दोघांनी लोकसभा अध्यक्षांना देण्यात येणा-या पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बंडाबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून ऑपरेशन फत्ते झाले असून, तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर सगळे पत्ते खुले करू, असा दावा करण्यात येत आहे.
या गोंधळाच्या स्थितीत ठाकरे गटाने उद्या (दि. १८) दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक बोलावून व्हिप जारी केला आहे. या बैठकीला ९ पैकी किती खासदार हजर राहतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ज्या ६ खासदारांनी पत्र दिल्याची चर्चा आहे. त्यातील एकानेही घूमजाव केले तर हे बंड फसणार आहे. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ४० आमदार व १२ खासदारांनी त्यांना साथ दिली होती. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना घोषित करून पक्षाचे नाव व चिन्ह बहाल केले होते. या फुटीला ४ वर्ष पूर्ण होत असताना ठाकरे गटावर आणखी एका फुटीचे सावट पडले आहे. गेल्या महिन्यापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची कुणकुण लागल्याने उद्धव ठाकरे यांनी रविवारी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ९ पैकी ५ खासदार वेगवेगळी कारणे सांगून गैरहजर राहिले.
त्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून अचानक घडामोडींना सुरुवात झाली. ठाकरे गटाचे संजय देशमुख, संजय जाधव, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाघचौरे एकेक करत दिल्लीत दाखल झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दिल्लीत दाखल झाले. या खासदारांनी वेगळा गट स्थापन करत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे समजते. परंतु याबाबत या खासदारांकडून अथवा लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून कोणताही दुजोरा दिला गेला नाही. ओमराजे निंबाळकर पुण्यात तर संजय दिना पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून ते मुंबईतच असल्याचे सांगण्यात येत होते. त्यातच ओमराजेंनी मीडियाशी बोलताना आपण दिल्लीत गेलो नाही, असे स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रता टाळण्यासाठी २ तृतीयांश फूट आवश्यक आहे. त्यामुळे बंडात ६ खासदार सहभागी असतील तरच हे बंड यशस्वी होईल अन्यथा ते फसणार आहे. शिंदे गटाकडून अधिकृतपणे काहीही जाहीर केले जात नसले तरी स्वतंत्र गट स्थापनेची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून कायदेशीर, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा गट शनिवारपर्यंत आमच्यासोबत आलेला असेल, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाकरे सेनेच्या तीन खासदारांसोबत दिल्लीत सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे उर्वरित ६ खासदार शिंदेंसोबत असल्याचे चित्र निर्माण झाले. दरम्यान, दुपारी अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या दृष्टीने सर्व खासदार आमच्यासोबत असून त्यांनी वेगळा गट केला असेल तर त्याची अधिकृत घोषणा का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. गुरुवारी आम्ही संसदीय पक्षाची बैठक बोलावली असून सर्व ९ खासदारांवर व्हिप बजावला असल्याचे सांगितले. या बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई व राजाभाऊ वाजे यांच्या व्यतिरिक्त कोणी खासदार उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, देशात बेरोजगारी, महागाई, दुष्काळ, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचारासारखे गंभीर प्रश्न असताना आणि सध्या देशाची अर्थव्यवस्था महासंकटात असताना यावर मंथन करून जनतेला दिलासा कसा द्यायचा, यासाठी लढण्याऐवजी विरोधी पक्षातील खासदार थेट सत्ताधा-यांच्या गोटात जाऊन सामिल होत असल्याने आधीच जनतेमध्ये प्रचंड संताप असताना ठाकरे सेनेच्या ६ खासदारांनी बंड केले. त्यामुळे ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षांनीदेखील शिंदे सेना, भाजपवर हल्लाबोल केला. त्यामुळे याचे आगामी काळात तीव्र पडसाद उमटू शकतात. त्यातच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी २० तारखेनंतर मी मीडियाला माझी भूमिका सांगणार असल्याचे म्हटले आहे.
राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबत !
ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दोघे ठाकरे यांच्या सोबत आहेत. आज नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही आपण ठाकरेंसोबत असल्याचे स्पष्ट केले. त्यातच बंडखोरीच्या पवित्र्यात असलेले खासदार संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे दोन्ही मतदारसंघ भाजपचे आहेत. २०२९ साली होणा-या लोकसभा निवडणुकीत या दोघांचेही राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या दोन्ही खासदारांना भाजपच्या नेत्यांकडून शब्द हवा आहे. दरम्यान, फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या नेत्यांशी भाजपने संवाद सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाने
घेतली ओम बिर्लांची भेट!
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व तीन खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन कोणत्याही गटाला मान्यता देऊ नये, अशी विनंती केली. त्याचबरोबर अध्यक्षांनी फुटीर गटाला मान्यता दिली तर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही ठाकरे गटाने केली आहे.
ऑपरेशन फत्ते झाले, शिंदे गटाचा दावा
एकीकडे ऑपरेशन टायगरबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच शिंदे सेनेने ऑपरेशन टायगर फत्ते झाल्याचा दावा केला आहे. मात्र, याबाबत आताच जाहीर घोषणा करायची नाही. ठाकरे सेनेची रणनीती काय आहे, हे लक्षात घेऊन येत्या २ दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे म्हटले आहे.
















