मुंबई : प्रतिनिधी
यंदाच्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने शेतक-यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप बाकी आहे. अशातच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद पेटला आहे.
सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. अनेक वर्षे काम चालू आहे, याची चिंता करायचं काम नाही. महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. शेतक-यांचं कर्ज माफ करणार आहोत. ते करणारच आहोत. परंतु, तिथपर्यंत आपलं काम थांबता कामा नये. उद्याच्या तरुणाच्या भविष्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, उद्योग उभारावे लागणार आहेत, असे म्हणत विखेंनी सारवासारव केली.
तसेच, कोविडच्या काळामध्ये दोन-अडीच वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते? असा सवाल करत माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणत लोकांना वा-यावर सोडत घरात बसले होते आणि आता मराठवाड्यात फिरत आहेत शेतक-यांना दिलासा द्यायला, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

