लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. हा जिल्हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आहे आणि आजही तो काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे, असे नमूद करून जिल्ह्यातील जनतेने भरघोस पाठिंबा आणि आशीर्वाद देत काँग्रेस पक्षावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी प्रयत्नशील राहतील, असे माजी मंत्री आमदार विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भाने प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची राज्यात आणि देश पातळीवर ओळख आहे. या नेत्यांनी सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण करून लातूरला कायम पुढे नेण्याचे काम केले आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणून विकास प्रक्रियेला गती देण्याचे काम आम्ही सुरू ठेवले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील जनतेचे आशीर्वाद काँग्रेस पक्षाला कायम पणाने मिळत राहिले आहेत.
लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा), राष्ट्रीय समाज पक्ष, ओबीसी बहुजन पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष व इतर मित्र पक्षाच्या सहकार्यातून प्रचार यंत्रणेला गती दिली. या निवडणुकीत लातूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १० पैकी ८ जागांवर काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवून लातूर पंचायत समितीमध्येही एकहाती विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेचया ५९ पैकी एकट्या काँग्रेस पक्षाने २३ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), शिवसेना (उबाठा), यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. काँग्रेस आघाडीला मिळालेल्या या यशात काँग्रेस आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करून मी लातूरचे जनतेचे मन:पूर्वक आभार मानत असल्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

