लातूर : प्रतिनिधी
प्लास्टिक पॅड्स पर्यावरणासाठी घातक असून त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळून कॉटन पॅड्स वापरण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी यांनी केले. दयानंद कला महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने आणि प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार, ‘मासिक पाळीतील सॅनिटरी पॅड जनजागृती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेत कॅन्सर मुक्त भारत अभियान अंतर्गत सौ. मोनिका सूर्यवंशी व सौ. स्मिता शिरोळे यांनी कॉटन सॅनिटरी पॅडचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यशाळेत बाजारात मिळणा-या नामांकित कंपन्यांच्या सॅनिटरी पॅड्स व कॉटन पॅड्स यांची तुलनात्मक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्लास्टिकयुक्त पॅड्समुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, तसेच खाज, इन्फेक्शन व त्वचारोगासारख्या समस्या निर्माण होतात, असे यावेळी सांगण्यात आले.

