मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (२ जुलै) माध्यमांशी बोलताना पुन्हा भारतीय जनता पक्षावर खरमरीत टीका केली. त्याचवेळी राज्यातील राजकारणाचा गोलपिठा कुणी केला, असा सवालही केला. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे असूनही शिवसेनेतून उपसभापती झालेल्या सचिन अहिर यांच्यावर सडकून टीका केली. कोणत्याही खासदाराचे नाव न घेता इकडचे जे खासदार फुटले, त्याचे बक्षीस म्हणून सचिन अहिर यांना उपसभापतिपद दिल्याचा मोठा दावा राऊत यांनी केला. खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सत्ताधा-यांवर कठोर टीका करताना भाजपचे राजकारण आणि सचिन अहिर यांना लक्ष्य केले. काल (१ जुलै) तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला.
प. बंगालमध्ये तृणमूलच्या आमदार, खासदारांवर हल्ले सुरू आहेत. या देशाचे राजकारण भाजपने इतक्या खालच्या पातळीवर नेले आहे की, भविष्यामध्ये सांगावे लागेल या देशात केव्हातरी लोकशाही होती, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला बोचकारले. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक प्रतिष्ठा होती. त्या राजकारणाचा गोलपिठा कुणी केला? या सर्वांचा डीएनए तपासावा लागेल, असा भाजपचे नाव न घेता राऊतांनी हल्लाबोल केला. त्याचवेळी ‘ऑपरेशन टायगर’, ‘ऑपरेशन तुतारी’ वगैरे बोलले जाते. एक दिवस ‘ऑपरेशन कमळ’देखील होईल, असे भाकित त्यांनी केले.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेचे नवे उपसभापती सचिन अहिर यांच्यावर कडवट टीका केली. सचिन अहिर यांचे काय झाले? इकडचे खासदार फोडल्याचे बक्षीस म्हणून सचिन अहिर यांना उपसभापतिपद देण्यात आले, असा आरोप राऊत यांनी केला. एवढेच नाही तर आमच्या पक्षात राहून सचिन अहिर शिंदे गटाचे, भाजपचे आणि फडणवीसांचे काम करत होते.
इकडचे खासदार फोडण्यात सचिन अहिर यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी अहिर यांचा समाचार घेतला. सचिन अहिर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. उपसभापतिपदासाठी त्यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याचे समोर आले. हा सर्वांसाठी ख-या अर्थाने धक्का होता. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आले होते.
















