जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील गव्हाण परिसरात तीव्र उन्हामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या गव्हाणमधील बेरजेसमध्ये पाणीसाठा नाही. या कारणाने पाणीटंचाई निर्माण झाली असून, तिरू मध्यम प्रकल्पातील पाणी तिरु नदीपात्रात सोडावे, यामुळे गव्हाण येथील उच्च पातळी बंधा-यांमध्ये पाणी येईल व निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई कमी होईल. यामुळे गव्हाण येथील उच्च पातळी बंधा-यांमध्ये तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी गुत्ती जिल्हा परिषद गटाच्या जि. प. सदस्या शांताबाई अदावळे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता साहेब पाटबंधारे विभाग, क्र. ०२, विभाग लातूर सिंचन भवन, यांच्याकडे केली आहे .
अतनूर, गव्हाण, मेवापूर येथील ग्रामपंचायतचे ठराव आपल्या विभागास पोहचविण्यात आले आहेत. अतनूर येथील तिरु नदीवरील पुलाचे काम सुरु असल्यामुळे तसेच गव्हाण बॅरेजेसच्या शेजारी दक्षिण काठावरील पिचिंगचे काम सुरु असल्या कारणाने सन २०२५-२६ च्या हंगामात गव्हाण बॅरेजमध्ये पाणी अडविण्यात आले नव्हते त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बाधीत झाला आहे.
परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जळकोट तालुक्यातील गव्हाण परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे तसेच पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी तिरु मध्यम प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्यात यावे व गव्हाण येथील बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध होईल यासाठी उपाय योजना करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या शांताबाई आदावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

