पुणे : प्रतिनिधी
राज्यातील ऊस गाळप हंगाम केवळ नव्वद ते शंभर दिवसांवर आल्याने उर्वरित दिवस कारखाने कसे चालवायचे, ही नवीन समस्या ऊस कारखाना क्षेत्रात निर्माण झाली आहे. गाळप हंगाम लवकर संपत असल्याने कारखाने अडचणीत आले आहेत, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘उसाचे उत्पादन वाढवून गाळप कालावधी वाढवणे तसेच डिस्टिलरी, सोलर, बायोसीएनजी आणि खाद्य बाजारपेठ या माध्यमातून गाळप हंगाम किमान दोनशे ते अडीचशे दिवस करण्यासाठी केंद्र सरकार आणि महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी सांगितली.
‘राज्यात १ नोव्हेंबर रोजी ऊस गाळप हंगाम सुरू झाला. आतापर्यंत सत्तर टक्के कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असून १५ मार्चपर्यंत सर्व कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. राज्यात पाच ते सहा वर्षांपूर्वी गाळप क्षमता प्रतिदिन साडेपाच लाख मेट्रिक टन होती.सध्या ती दुप्पट झाली आहे. पूर्वी जूनपर्यंत कारखाने सुरू राहायचे. आता गाळप क्षमता वाढली असली तरी कारखाने लवकर बंद होत असल्याने उत्पादकता वाढवणे हाच पर्याय आहे. याबाबत महासंघ, विस्मा आणि इतर संघटनांसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.सोलर, बायोसीएनजी आणि खाद्य बाजारपेठ यासंदर्भात महासंघाने केंद्र सरकारला अहवाल पाठवला असून त्यावर केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. चार-पाच वर्षांनी कारखान्यांचा कालावधी वाढू शकेल, असे पाटील यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात साखर दरात मंदी आहे, असे नमूद करून ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय दर प्रति क्विंटल साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे. साखरेचा यावर्षीचा देशांतर्गत वापर २७५ लाख मेट्रिक टन आहे. लोकसंख्या वाढत आहे.
मात्र, साखरेचा वापर कमी होत असल्याने साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर उपाय म्हणून इथेनॉलचा कोटा साठ कोटींनी वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. देशात ५ कोटी शेतकरी ऊस पिकवतात.उसाच्या रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) देशातील थकबाकी सात ते आठ कोटी आणि राज्यात सुमारे चार हजार कोटी रुपये आहे. एफआरपी वेळेत देण्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत ४१०० रुपये करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
ऊस हंगाम १५ मार्चपर्यंत संपण्याची शक्यता
सन २०२५-२६ या ऊस गाळप हंगामात देशात २२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.राज्यातील उसाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त असूनही दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाल्याने चालू वर्षाचा ऊस हंगाम उशिरा सुरू होऊनही १५ मार्चपर्यंत संपण्याची शक्यता आहे. ऊस तोडीसाठी केन हार्वेस्टरचा वापर वाढला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत देशातील ४५४ साखर कारखान्यांपैकी ८० कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. या महिना अखेरीस १६० कारखाने बंद होतील असे ते म्हणाले.

