पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी/प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहानंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणा-या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणा-या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलिस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहतंय? असा सवाल त्यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शहरातील महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कोयता गँगचा धुमाकूळ, गोळीबार आणि लूटमारीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मूळ गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेले पोलिस केवळ सणासुदीच्या काळातच गरिबांचे धंदे बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिस आयुक्तांच्या तांत्रिक दाव्यांचा समाचार घेताना, हा प्रकार ‘आजारापेक्षा उपचार भयंकर’ असल्याची सणसणीत चपराक त्यांनी लगावली आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलिसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलिस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करून पोलिस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहत आहे? असा सवाल सुळे यांनी केला आहे.
नेमका प्रतिबंध कशाला?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पोलिस आयुक्त, जमावबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असे म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्त्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे? हा तर ‘आजारापेक्षा उपचार भयंकर’ असा प्रकार आहे असे सुळे यांनी म्हटले आहे.
















