लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६ : ग्रामीण टी-१०’ स्पर्धा यंदा नव्या स्वरूपात रंगणार आहेत. मागील ३ वर्षांत स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाच्या स्पर्धेकडे जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. यावर्षी मुलांच्या संघा सोबतच मुलींचे संघदेखील सहभागी होणार आहेत.
दि. २० ते २५ मे २०२६ या कालावधीत दयानंद महाविद्यालय, लातूर येथील क्रिकेट मैदानावर मुलांचे आणि मुलींचे क्रिकेट सामने दुपारी ३ वाजता सुरू होतील. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना राज्यस्तरावर पोहोचण्यासाठी सक्षम व्यासपीठ निर्माण व्हावे, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. मागील ३ वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तब्बल १८० गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यांचे एकूण १२ संघ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश आहे.
स्पर्धेत सहभागी होणारे संघ पुढीलप्रमाणे- औसा वॉरियर्स, जळकोट टायटन्स, चाकुर चार्जर्स, निलंगा नाईट्स, शिरुर अनंतपाळ स्ट्रायकर्स, लातूर सीटी किंग्स, लातूर लायन्स, देवणी डेअरडेव्हील्स, उदगीर युनायटेड, ग्रामीण इंडियन्स, रेणापूर रॉयल्स, अहमदपूर असॅसिन्स. स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या संघांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट फलंदाज’, ‘उत्कृष्ट गोलंदाज’ आणि ‘उत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ अशा वैयक्तिक पुरस्कारांनी खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंचा विशेष संघ तयार करण्यात येणार असून, या संघाला महाराष्ट्र स्तरावरील विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामीण टी-१०च्या माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे, त्यांना मोठ्या स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि लपलेल्या गुणवत्तेला राज्यस्तरावर संधी मिळवून देणे, हा धिरज विलासराव देशमुख यांच्या या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
















