पुणे : दूषित पाणी तसेच कोंबड्याचे चिकन खाल्ल्यामुळे सुद्धा ‘जीबीएस’चे रुग्ण सापडत आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. त्यामुळे चिकन पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजे, असा सल्ला अजितदादा पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
पुण्यानंतर राज्यातही गुइलेन बॅरे सिंड्रोमचे अर्थात ‘जीबीएस’चे रुग्ण वाढत आहेत. कोल्हापुरात ‘जीबीएस’च्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘जीबीएस’ हा फक्त दूषित पाण्याने होत असल्याचे सांगितले जात होते. पण, ‘जीबीएस’ पसरण्यामागे आणखी एक कारण समोर आले आहे.
अजितदादा म्हणाले, पुणे दौ-यात विभागीय आयुक्त मला भेटले. कच्चे चिकन खाल्ल्याने खडकवासला भागात ‘जीबीएस’चे रुग्ण जास्त सापडत आहेत, अशी चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चिकन पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजे.
चिकन कच्चे राहिल्यास त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ‘जीबीएस’ आटोक्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, अशी माहिती पसरता कामा नये. याकरिता महापालिका आयुक्तांनी याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसृत कराव्यात, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे चिकन खाऊ नये, कोंबड्यांची विल्हेवाट लावावी, असे करण्याचे काही कारण नाही, असे अजितदादांनी म्हटले आहे.