अंजली दमानियांचा थेट अजित पवारांवर प्रहार
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकारपत्रधारक (कुलमुखत्यारधार) शितल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात संबंधित अधिका-यांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिका-यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता, असे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटले. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. मात्र, अजित पवार या जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर अधिका-यांवर फोडत आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. मला असे वाटते की, लहान मुले जेव्हा शाळेत जातात, जेव्हा ते छोटे असते, तेव्हा मारामारी करते, त्यावेळी शिक्षकाने त्यांना थांबवायला हवं होते, असे सांगितले जाते. तसेच काहीसे विधान अजित पवारांचे वाटत आहे. त्यांचा पार्थ पवार काही कुकूला बाळ नाही आणि त्यांनी जे केली ती चूक नाही, हे फ्रॉड आहे.
पार्थ पवारने जे
केले तो फ्रॉड
पार्थ पवारने एकदा नाही तर सगळे डॉक्युमेंट बदलून जे पहिल्यांदा सप्लीमेंट एलएलपी बनवले, रेसुलेशन पास केले, खोटा एलओआय घेतला, त्यानंतर एडजुडिकेशन केले, सेल डिल केले आणि त्यानंतर पझेशनपर्यंत जर या व्यक्तीने केले असेल तर ही काही छोटी चूक नाही, तर हा फ्रॉड आहे, त्यांना मुलाची चूक दिसत नसेल, तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा, आम्ही त्यासाठी लढू, असेही त्या म्हणाल्या.

