जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहर तसेच तालुक्यात दि १७ मार्च रोजी रात्री वादळी वारा सुटला होता. यामुळे तालुक्यातील शेतक-यांच्या आंब्याच्या बागेस याचा मोठा फटका बसला आहे. आंबा उत्पादक शेतक-यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जळकोट शहरातील सुनील अवलवार यांच्या गट नंबर १०८२ मधील एक हेक्टर जमिनीमध्ये असलेल्या १०० केशर आंब्याच्या झाडावरील या वादळामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जवळपास ५० टक्के आंब्याची गळ या ठिकाणी झाली आहे. यामुळे सदरील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतक-याने गत चार वर्षांपासून आपल्या बागेची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतली होती .
आता काही दिवसांमध्ये ही बाग तोडणीडीस येणार होती. काहीतरी पैसे मिळतील अशी अपेक्षा या शेतक-यांना होती परंतु रात्री झालेल्या जोरदार वा-यामुळे आंब्याच्या झाडावरील अनेक आंबे जमिनीवर गळून पडले आहेत. अगदी हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेला आहे . शेतक-यांचा खर्चही निघणार नाही अशी अवस्था झाली आहे. सदरील शेतक-यास तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंबा उत्पादक शेतकरी सुनील अवलवार (जळकोट) यांनी केली आहे.

