नागपूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप आधीच सुटायला हवा होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजामध्ये भांडण लावायची सवय आहे त्यामुळे आरक्षणासंबंधी निर्णय घेण्यास उशीर झाला. आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाचेही अधिकार अबाधित ठेवायचे आहेत आणि मराठा समाजाचे अधिकार आरक्षण देता आला पाहिजे. या आंदोलनातून स्पष्टता अजून बाकी असून २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंबंधी जो जीआर सरकारने काढला त्यामुळे मराठा-ओबीसी समाजाची फसवणूक झाली असल्याची अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे.
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी पाच दिवसांचे उपोषण केले. यानंतर जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विजय झाला असल्याचे म्हणत गुलाल उधळला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी नागपूरमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुळात हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा राजकीय कमी किंवा हा सोशल इकॉनॉमिकल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. वेगळा देश जो निर्माण झाला त्या अनुषंगाने शोधण्याची आवश्यकता आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा परंपरा लाभली आहे, मात्र गेल्या काही काळात मोदी सरकार आल्यावर जे धोरण देशात राबवली जात आहेत या परिस्थितीने शासन केला आहे त्यामुळे उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली आहे, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचलला त्यांनी तळागाळातील मराठा समाजातील अपेक्षा अधोरेखित करीत असताना या मोहिमेचा नेतृत्व केले. मागच्यावेळी नवी मुंबईच्या वेशीवरून गुलाल उधळून आंदोलकांना वापस पाठवले आणि आरक्षण मिळाले अशी आवई ठोकल्या गेली आणि मराठा समाजाचे फसवणूक झाली, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. निवडणुका लागल्या त्यावेळी सात दिवसाच्या आत आरक्षण देऊन असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते.
ओबीसींच्या आरक्षणात वाढ आवश्यक
मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता कालच्या निर्णयाच्या माध्यमातून असू शकते त्यामुळे स्पष्टता आणणे फार आवश्यक आहे. या एकूण सर्व शासन निर्णयाच्या जी चर्चा ऐकतो त्याचा योग्य स्वरूपात निघू द्या आमची जी भूमिका आहे ती मराठ्यांना आरक्षण देण्याची आहे मात्र ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे या आरक्षणातही वाढ झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.
















