इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यामध्ये भारतीय वायुसेना आणि लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. या कारवाईनंतर पाकिस्तानचे लष्कर बॅकफूटवर गेले, देशांतर्गत विरोधकांना उत्तर देताना त्यांची दमछाक होत आहे. यावरून मौलाना यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांना चांगलेच सुनावले. तुम्ही पाकिस्तानविरोधी दहशतवादी लपल्याचे सांगत अफगाणिस्तान, इराणवर हल्ले केले मग भारताने केलेले ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते, अशा शब्दांत मौलानांनी मुनीर यांची बोलती बंद केली. भारतही तेच सांगतोय काश्मीरवर हल्ले करणारे दहशतवादी इथे लपले होते, असे मौलाना म्हणाले.
अंतर्गत कलह वाढला मौलाना फझलुर रहमान यांनी केवळ युद्धावरूनच नव्हे, तर पाकिस्तानच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी देखील लष्कराच्या हस्तक्षेपाला जबाबदार धरले. लष्कराने सत्तेत हस्तक्षेप केल्यामुळेच आज पाकिस्तानवर ही वेळ आली आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
जनरल आसिम मुनीर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला ‘दैवी शक्ती’ मिळाल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना मौलाना म्हणाले की, लष्करी नेतृत्व जनतेसमोर खोटी चित्रे उभी करत आहे. प्रत्यक्षात भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. देशाची जनता आता सगळे जाणून आहे, त्यांना मूर्ख बनवणे थांबवा, असा इशारा त्यांनी दिला.

