लातूर : प्रतिनिधी
दशनाम गोसावी समाज लातूर व गोसावी वुमन्स विंग लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ ऑगस्ट रोजी येथील गांधी मार्केटमधील डॉ. भालचंद्र रक्तपेढी सभागृहात पंचसुत्री सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती धर्मवीर भारती यांनी मंगळवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस व्यंकटेश पुरी, सुरेखा भारती, अलका गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. गोसावी समाजाचा सन १९९६ मध्ये पहिला मेळावा घेण्यात आला होता. पुढे समाजात विचारमंथन व्हावे, धर्मशिक्षण मिळावे, यासाठी प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरुच आहे. समाजातील महिलांच्या सन्मानासाठी पुरुषांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत, असे नमुद करुन पंचसुत्री सोहळ्याबद्दल माहिती देताना धर्मवीर भारती म्हणाले, गोसावी समाजातील सेवानिवृत्त ज्येष्ठांचा सन्मान, धर्मप्रचार करणारे हरीभक्त पारायण, किर्तनकारांचा सन्मान हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्तीचे वितरण होणार आहे. गुणवंत विद्यार्थी व पुजापाठ करणा-यांचा सन्मान आणि विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, असा हा पंचसुत्री सोहळा आहे. यावेळी बोलताना सुरेखा भारती म्हणाल्या, गोसावी वुमन्स विंग गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे.
१८ ते ८० वर्षांच्या महिलांचे हे संघटन आहे. दर महिन्याला सामाजिक उपक्रम घेतले जातात. समाजातील मुलींना शैक्षणिक मदत हा मुख्य उद्देश आहे. हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमातून समाजातील विधवा महिलांना जाणिवपूर्वक सहभागी करुन घेतले जाते. महिला स्वावलंबी कशा बनतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गरजू महिलांना आवश्यक ती मदत देण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. प्रारंभी व्यंकटेश पुरी यांनी प्रास्ताविक करताना दशनाम गोसावी समाजाचा इतिहास नमुद करताना दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले.
















