मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय चर्चेत आला आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण लांबण्याची शक्यता आहे. असे असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. ‘जर आज अजित पवार जिवंत असते तर पक्षातील दोन्ही गट विलीन झाले असते. अजित पवारांनी १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत १२ फेब्रुवारी ही दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची तारीख निश्चित केली होती’, असे खासदार सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचे कुटुंब खूप कठीण काळातून जात आहे. आम्ही एकमेकांना पाठिंबा देऊन पुढे जात आहोत. आज दादा (अजित पवार) आपल्यात नाहीत, त्यामुळे मला जुन्या गोष्टी उलगडायच्या नाहीत. माझ्या आणि दादामध्ये जे काही घडले ते आपल्यात आहे. आता दादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांची अस्वस्थता स्वाभाविक आहे. अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. तसेच पुढच्या महिन्याभरात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

