पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बिहारमधील एसआयआरवरून सभागृहात बराच गोंधळ झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनीही राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. त्यामुळे दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून, या भेटीगाठीमुळे आता चर्चेला उधाण आले आहे. तसेच काही तरी मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही सरकारमधील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे या भेटी सामान्य नाहीत. जेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री राष्ट्रपतींना भेटतात, तेव्हा ती औपचारिक बैठक असते किंवा ते एखादा खास प्रसंग असतो. मात्र, दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, राजकीय विश्लेषकांच्या मते संसदेत एखादे महत्वाचे विधेयक सादर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट होते. मात्र या भेटीवर सरकारकडून कोणतेही विधान आलेले नाही. मात्र, या भेटींमागे नक्कीच काही तरी दडलेले असण्याची शक्यता आहे.
भेटीमागील कारणे
काय असू शकतात?
जर केंद्र सरकारला एखादा मोठा संवैधानिक किंवा राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर त्याबाबत चर्चेसाठी ही भेट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भेट एखाद्या महत्वाच्या नियुक्तीबाबतही असू शकते. तसेच उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीबाबतही यात चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
काश्मीर किंवा इतर
राज्यबाबत निर्णय?
पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जात आहे. याबाबत आणि ईशान्येकडील राज्यामध्ये बांगलादेशशी संबंधित घुसखोरीबाबत सरकारची काय भूमिका आहे, याबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

