पुणे : प्रतिनिधी
टाळ, मृदंगाच्या तालावर आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम व ‘माऊली, माऊली’ असा जयघोष करीत डोक्यावर तुळशी वृंदावन व हातामध्ये दिंड्या पताका घेतलेले वारकरी,अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने श्री क्षेत्र पंढरपूरकडे दुपारी प्रस्थान ठेवले. पालखी सोहळ्यात वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी वरुणराजाने हजेरी लावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज मंदिर, श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, विजय शिवतारे, अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.
दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महापूजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले. गेल्या काही दिवसांपासून वारकरी श्री क्षेत्र देहू येथे आले आहेत. त्यामुळे सारा परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात निनादला आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे. पालखी सोहळा पुढील मुक्काम उद्योग नगरीतील आकुर्डी येथे असणार आहे.