मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपविणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने येत्या ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा प्रण केलेला आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी नक्षलवाद्यांच्या तळांवर हल्ले केले जात आहेत. तर काही नक्षलींचे प्रबोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळाले असून, आता नक्षलवाद फक्त ११ जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
देशात १९६७ सालापासून नक्षलवादी चळवळ पाहायला मिळते. आता याच नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने नुकताच रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. यामध्ये अगोदर नक्षलवादाचा प्रभाव असणारे जिल्हे आणि आता नक्षलवादाचा प्रभाव असलेले जिल्हे दाखवण्यात आले आहेत.
२०१४ अगोदर १८२ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव होता. आता ही संख्या फक्त ११ जिल्ह्यांपर्यंत राहिली आहे. गृहमंत्रालयाच्या दाव्यानुसार २०१४ साली ३३० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नक्षली हिंसेच्या घटना घडल्या होत्या. आता ही संख्या फारच कमी झाली आहे. अगोदर १८ हजार वर्ग किलोमीटरपर्यंत नक्षलवादाचा प्रभाव होता. आता तो फक्त ४२०० वर्ग किलोमीटरपर्यंत शिल्लक राहिलेला आहे.
२००४ ते २०१४ पर्यंत
१६ हजारांवर नक्षली हिंसा
२००४ ते २०१४ या काळात एकूण १६,४६३ नक्षली हिंसेच्या घटना घडल्या होत्या. आता ही संख्या २०१४ ते २०२५ पर्यंत ५३ टक्क्यांनी कमी होऊन ७,७४४ पर्यंत कमी झालेली आहे.
















