मुंबई : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर कोकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकीकडे नीट पेपरफूटीचे प्रकरण ताजे असतानाच टीईटीचा देखील पेपर फुटला आणि आता महाराष्ट्रात आणखी एक पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरतीप्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या परीक्षेतील १०० पैकी ९० प्रश्न व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा विद्यार्थ्यांकडून दावा करण्यात आला आहे. याबाबतचे काही स्क्रीन शॉट्स देखील समोर आले आहेत. ज्यात स्पष्टपणे संबंधित प्रश्न औषध निरीक्षक भरती परीक्षेचे असल्याचा दावा केला जात आहे. दोन उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली होती. या प्रश्नांबाबतचे अनेक स्क्रीन शॉट विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर २० मार्च रोजी व्हायरल झाले होते.
तसेच प्रश्न फोडण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेतल्याचा देखील आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा दावा चॅटींगमधून समोर आला आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आयोगाकडून स्पष्टीकरण
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करत भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले आहे. प्राप्त तक्रारीतील तथ्यांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महेबुब शेख यांची पोस्ट
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी एक्सवर या प्रकरणाबाबत पोस्ट करत म्हटले आहे की, टढरउ औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एका पेपरचा प्रश्न नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज ‘एमपीएससी औषध निरीक्षक’ परीक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा प्रकार समोर येत आहे. जर हे सत्य असेल, तर हा केवळ पेपरफुटीचा विषय नाही, तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला हादरा देणारा प्रकार आहे. एका प्रश्नपत्रिकेची किंमत काही पानांची नसते. तिच्यामागे हजारो विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत, पालकांचे कष्ट, त्याग आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने असतात. काही मोजक्या लोकांच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
आमचा लढा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी
आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. आमचा लढा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी,जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे. आमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यास आम्ही तयार आहोत. दोषी कोणताही असो, त्याला कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई झाली पाहिजे.
















