आषाढीनिमित्त १५ लाखांवर भाविक दाखल, चंद्रभागेत पवित्र स्रानासाठी गर्दी
अपराजित सर्वगोड/पंढरपूर
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरनगरीत अभूतपूर्व भक्तिसागर उसळला असून, १५ लाखांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहेत.
टाळ, मृदंगाच्या गजराने आणि ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण पंढरपूर दुमदुमून गेले असून चंद्रभागा नदीचा परिसर, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख मार्ग वारकरी व भाविकांनी फुलून गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल व माता रुक्मिणीची पारंपरिक शासकीय महापूजा शनिवारी पहाटे सुमारे २.३० वाजता विधिवत संपन्न होणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्रान करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन, मुखदर्शन आणि शिखर दर्शनासाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली. मुखदर्शनासाठी सुमारे ३२ ते ३४ तासांचा कालावधी लागत असून, चरण दर्शनाच्या रांगेत एक लाखाहून अधिक भाविक तर मुखदर्शनाच्या रांगेत १५ ते २० हजार भाविक उभे आहेत.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड तसेच सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समिती, नगरपालिका आणि विविध शासकीय विभागांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात्रेचे नियोजन केले होते. लाखो वारक-यांच्या उपस्थितीत पंढरपूर नगरी भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजराने अक्षरश: दुमदुमून गेली असून, आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे.
व्यापक नियोजन
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर समिती, जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच विविध विभागांनी व्यापक नियोजन केले आहे. दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.
















