अहिल्यानगर : आम आदमी पक्षातून राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी इतर ६ राज्यसभा खासदारांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा केली. या घटनेची देशाच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे. अशामध्ये आता या घडामोडींवरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशामध्ये आता समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्ष टिकवण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही.’ असे म्हणत घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
राजकीय पक्षांतर हे चीड आणणारे असल्याचे समाजसेवक अण्णा हजारे यावेळी म्हणाले आहेत. ‘‘पक्ष आणि पार्टी टिकण्यासाठी एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. सत्ता आणि पैसा यांच्या लालसेमध्ये येताच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पक्षांतर होते. त्यामुळे, मनमर्जीप्रमाणे सत्ताबदलाचे काम होते हे बरोबर नाही, असे म्हणत त्यांनी ‘आप’मध्ये झालेल्या राजकीय भूकंपावर भाष्य केले.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातूनच आम आदमी पक्ष उदयास आला. पण आता पक्ष फुटत असल्याची खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘स्वार्थ संपल्यानंतर लोक सोडून जातात, समाज आणि देश डोळ्यांसमोर ठेवून काम केल्यास कोणीही जाणार नाही. आज समाज आणि देशाला विसरून नेते सत्ता आणि पैशाच्या पाठीमागे लागत आहेत. म्हणून लोकांनी निवडून देताना चारित्र्यवान उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. हे जे सुरू आहे ते स्वार्थासाठी सुरू आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही, असे ते यावेळी म्हणाले.

