चाकूर : प्रतिनिधी
समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका फार महत्वाची असून ख-या अर्थाने पत्रकारांच्या लेखणीतूनच समाजाचे प्रतिबिंब उमटते. पत्रकार हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असून पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा अधिक धारदार असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. ते चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात चाकूर सिटी प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष करीम गुळवे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिपाळे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर, कामगार नेते पप्पूभाई शेख हे उपस्थित होते. या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांना स्व.नागोराव संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ पत्रकार अ.ना.शिंदे यांच्यावतीने ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’,मुंबई येथील वरिष्ठ सहाय्यक संचालक,जनसंपर्क विभागातील काशीबाई थोरात यांना स्व.काशीबाई बळीराम सोनटक्के यांच्या स्मरणार्थ जेष्ठ स्वातंत्र सैनिक बळीराम सोनटक्के व पत्रकार संगमेश्वर जनगावे यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार’ तर दैनिक सामनाचे लातूर जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर यांना कालवश मालनबाई सोपानराव कांबळे व कालवश सोपान काशीराम कांबळे यांच्या स्मरणार्थ पत्रकार मधुकर कांबळे यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय मायदादा वृत्तरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानीत करण्यात आले.
प्रास्ताविकात या पुरस्काराची भूमिका सिटी प्रेस क्लबचे सचिव मधुकर कांबळे यांनी विशद केली.अध्यक्ष प्रा. अ. ना. शिंदे यांनी पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी यांच्या कार्याच्या आढावा घेत परिचय करून दिला. या कार्यक्रमास व्ही. एस. पँथर्सचे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, दशरथ अर्बन बँकेचे चेअरमन दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष संदीप शेटे,प्रा. डॉ. बी. डी. पवार यांच्यासह विविध वर्तमान पत्राचे प्रतिनिधीची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संगमेश्वर जनगावे, सलीम तांबोळी, सुनील भोसले, के. आर. वाघमारे, विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सिटी प्रेस क्लबचे सल्लागार प्रा. डॉ.राजेश तगडपल्लेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन सलीम तांबोळी यांनी मानले

