26.9 C
Latur
Sunday, July 20, 2025
Homeलातूरपशुधनात गुणात्मक आणि संख्यात्मक वृद्धी आवश्यक

पशुधनात गुणात्मक आणि संख्यात्मक वृद्धी आवश्यक

लातूर : प्रतिनिधी
शुद्ध पैदास, समतोल आहार, काटेकोर व्यवस्थापन आणि चांगले आरोग्य हे पशुधनाच्या गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून पशुधनात गुणात्मक आणि संख्यात्मक वृध्दी आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
ब्रह्मवाडी ता. चाकूर येथे कृषि महाविद्यालय, लातूर अंतर्गत राबविण्यात येणा-या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्नता कार्यक्रमाअंतर्गत देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने शेतकरी व पशुपालक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शेतक-यांचा व पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय भामरे, मांजरा कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप देशमुख, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील साळी, डॉ. श्रीमंत बनसोडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक देविदास चाटे, पशुपालक बाबाराव सलगर आणि बसवंत कांबळे यांचा समावेश होता.
लातूर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त व पठारी भूगोल लक्षात घेता जनावरांचे लसीकरण अत्यावश्यक आहे. दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालन हे ग्रामीण भागातील आर्थिक आधार असून, संसर्गजन्य रोगांमुळे उत्पादनावर व आर्थिक स्थैर्यावर परिणाम होतो, असे सांगून डॉ. ठोंबरे म्हणाले की, लाळ्या खुरकूत, फ-या, घटसर्प व लम्पी स्किन या रोगांचा प्रतिबंध लसीकरणाद्वारे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शुद्ध गोवंश विकत मिळत नाही, तो पाळला जातो या उक्तीचा संदर्भ देत लसीकरण मोहीम ही पावसाळ्यात विशेषत: आवश्यक आहे.
या कार्यक्रमात डॉ. संदीप देशमुख यांनी नैसर्गिक शेतीसाठी पशुधनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले, तर डॉ. सुनील साळी यांनी पशुधनातील संसर्गजन्य आजार व त्यांचे व्यवस्थापन यावर माहिती दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय भामरे यांनी केले. सूत्रसंचालन कृषिदूत सचिन यादव यांनी केले, तर आभार निर्भय त्रिपाठी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एम. पठाण, चंद्रकांत स्वामी, कृषी महाविद्यालय लातूरचे कृषिदूत व कृषिकन्या यांनी विशेष परिश्रम
घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR