लातूर : प्रतिनिधी
पशुपालकांना वेळेवर उपचार, रोगप्रतिबंधक लसीकरण आणि आधुनिक पशुपालन व्यवस्थापन यावर भर देण्याची गरज आहे. पशुपालकांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच श्वानांचे निर्बीजीकरण करून लातूर जिल्हा रेबीजमुक्त करण्याचे आवाहनही लातूरचे जिल्हाधिकारी तथा पशुवैद्यक डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.
जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त लातूर येथे पशुसंवर्धन विभाग, लातूर व एमएसडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पशुवैद्यक : अन्नसुरक्षा व सार्वजनिक आरोग्याचे रक्षक’ या विषयावर जिल्हास्तरीय तांत्रिक परिसंवाद उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, कर्नाटक पशुवैद्यकीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. शिवशंकर उस्तूरगे, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, देवणी गोवंश संघटनेचे डॉ. भास्कर बोरगावकर, ज्येष्ठ पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. अनिल भिकाने, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. भिकाने म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत पशुवैद्यकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून अन्नसुरक्षा, अन्न सुरक्षितता व सार्वजनिक आरोग्याचे खरे रक्षक म्हणून पशुवैद्यकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी प्रा. डॉ. ठोंबरे म्हणाले, पशुवैदक, शेतकरी, पशुपालक व शास्त्रज्ञ् यांनी पशुधनाच्या पैदास, आहार, व्यवस्थापन व आरोग्य या बाबत भविष्यवेध घेउन गुणात्मक व संख्यात्मक पशुधन वृद्धीतुन पशुपालक आत्मनिर्भर होण्यासाठी संयुक्त प्रयत्न करावेत. तसेच डॉ. सोनवणे व डॉ. बोरगावकर यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजकुमार पडिले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले. त्यांना डॉ. समीर सास्तुरकर यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन डॉ. सुधाकर साळवे यांनी केले. कार्यक्रमास एमएसडीचे प्रक्षेत्र व्यवस्थापक कुणाल घुगांर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील १५० हून अधिक पशुवैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, खाजगी पशुवैद्यक, उद्योजक व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















