शिरवळ (पुणे) : प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ येथे मंगळवारी (११ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. पुण्याहून साता-याच्या दिशेने जाणा-या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कार पुण्याहून साता-याच्या दिशेनं जात होती. प्रवासादरम्यान चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की पलटी झालेली कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन समोरून येणा-या ट्रकला धडकली. कार आणि ट्रकच्या या धडकेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील चार युवकांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये तळेगाव दाभाडे येथील वेदांत अर्जुन वारिंगे (१९), कामशेत येथील सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९), टाकवे येथील आदित्य बाळासाहेब गरुड (१९) आणि कामशेत येथील निखिल बाळू राऊत (२०) यांचा समावेश आहे. सर्व मृत युवक हे मावळ परिसरातील रहिवासी असल्यानं या घटनेनं तळेगाव दाभाडे, कामशेत आणि टाकवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दीक्षित दयानंद पुजारी (२०), रा. कामशेत आणि मयूर हनुमंत शिंदे (२०), रा. बहुर, कामशेत हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी तिघेजण कुटुंबातील एकुलती एक मुले होती. सर्वजण महाबळेश्वरला फिरायला जात असताना काळानं चौघांवर झडप घातली.















