मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळुरू व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईपर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न विचारून अजित पवारांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
भाजपा महायुती सरकारचा आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांचा समाचार घेत हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुणे हे महाराष्ट्रातील औद्योगिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचे महत्वाचे केंद्र आहे. पुण्याचा नावलौकिक सर्वच बाबतीत मोठा होता पण तो आता इतिहासजमा झाला असून पुण्यात आता कोयता गँग, ड्रग्जचा काळाबाजार जोरात सुरु आहे. एक पाऊस पडला तरी पुणे जलमय होते त्यातच ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे, परिणामी आयटी उद्योगाला घरघर लागली. पुण्यासह राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षाचा वाढलेला भ्रष्टाचार, पदाधिका-यांची गुंडगिरी यांना उद्योजक वैतागले असून पायाभूत सुविधांचा बट्टयाबोळ झाला आहे म्हणून आयटी उद्योग दुस-या राज्यात जात आहेत. राज्यातील आहे ते उद्योग तर जातच आहेत पण राज्यात येऊ घातलेली मोठी गुंतवणूकही कशी गुजरातली गेली हे काँग्रेस पक्षाने सातत्याने उघड केले आहे.
वेदांता फॉक्सकॉन हा तब्बल १.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व २ लाख रोजगार देणारा उद्योग भाजपा महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातला गेला पण भाजपा सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. आता जर उपमुख्यमंत्रीच उद्योग बाहेर जात आहेत हे सांगत असतील तर सरकारने यावर खुलासा करावा, असे सपकाळ म्हणाले.
नाशिक, नागपूर, मुंबईतही हीच स्थिती
फक्त पुणे शहराचीच वाताहत होत नसून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईतही फारशी समाधानकारक परिस्थिती नाही. राज्यात बेरोजगारांच्या फौजा उभ्या आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, शेतक-याच्या शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत, महागाईने जगणे कठीण झाले आहे आणि सरकारचे मंत्री मात्र हिंदू-मुस्लीम भांडणे लावून खोके भरत आहेत. ही आका व खोके संस्कृतीच महाराष्ट्राचा घात करत असून एवढे भ्रष्ट, निष्क्रीय व निर्ल्लज सरकार राज्यात आजपर्यंत झालेले नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
















