लातूर : प्रतिनिधी
बालविवाह मुक्त भारत अभियान आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या अंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आशा मोहिमेअंतर्गत लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर येथील संत नामदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. बाल विवाहाचे दुष्परिणाम, बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६, बाल संरक्षणाशी संबंधित विविध कायदे याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी विद्यार्थ्यांना बाल विवाहास कठोर विरोध करण्याचे आवाहन केले. तसेच बाल विवाहामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होतो. विवाहासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मुख्याध्यापिका बी. एस. परगे, मुख्य न्यायरक्षक ए. जे. तिवारी, बालसंरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. गिरवलकर तसेच इतर मान्यवरांच्या आवाहनानुसार उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी बालविवाह मुक्त भारत निर्माण करण्यासाठी सामूहिक शपथ घेतली.

