जागावाटपावर मतैक्य नाही, पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल
पाटणा : वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा संपला. परंतु महाआघाडीत जागावाटपाबाबत अद्याप एकमत झालेले नाही. जागावाटपावरून राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीआयपी यांच्यात वाद रंगला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनुकूल स्थिती असताना महाविकास आघाडीत जसा गोंधळ पाहायला मिळाला, त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये झाल्याचे चित्र आहे. जागावाटपाची घोषणा न होताच पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १२५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात राजदने ७२, काँग्रेसने २४, डावे २१, व्हीआयपीने ३ आणि आयआयपीने २ जागांसाठी अर्ज दाखल केले.
नामांकनाच्या पहिल्या टप्प्यात ४ जागांवर महाआघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत. दोन्ही टप्प्यात महाआघाडीचे पक्ष १० जागांवर एकमेकांविरुद्ध लढत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्या ताब्यात असलेल्या जागेवर आरजेडीने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससाठी लोकप्रिय असलेल्या कुटुम्बा येथून प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे उमेदवार आहेत. या जागेसाठी आरजेडीने त्यांचे नेते सुरेश पासवान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, औरंगाबादमध्ये ५-६ जागांवर मैत्रीपूर्ण लढाईची तयारी सुरू आहे.
विकासशील इंसान पक्षाचे मुकेश साहनी आता १५ जागांवर समाधानी आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्यस्थीमुळे मार्ग निघाला. यात सीपीआय (एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य यांनीही वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, आता झामुमोने महाआघाडीची साथ सोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाआघाडीला धक्का बसला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही घोषणा केली.
एनडीएला धक्का
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पहिला धक्का बसला. छपरा जिल्ह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघातील लोजपच्या उमेदवार सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. हा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने या जागेवर राजदविरुद्ध जनसुराज अशी लढत होईल. त्यामुळे एनडीएला धक्का बसला आहे.
















