Homeमुख्य बातम्याबिहारातील मतदार पडताळणी; संसदेत विरोधकांची घोषणाबाजी

बिहारातील मतदार पडताळणी; संसदेत विरोधकांची घोषणाबाजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुरुवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस होता. लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होताच, विरोधी पक्षाच्या खासदारांनी बिहार मतदार पडताळणीच्या मुद्द्यावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

काँग्रेससह अनेक विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन पोस्टर झळकावण्यास सुरुवात केली. सभापती ओम बिर्ला म्हणाले – जर तुम्ही फलक घेऊन आलात तर सभागृह चालणार नाही. त्यांनी काँग्रेसच्या खासदारांना सांगितले – हे तुमचे संस्कार नाहीत.

गोंधळादरम्यान, लोकसभेचे कामकाज आज फक्त १२ मिनिटे चालू शकले. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्याच वेळी, राज्यसभेचे कामकाज फक्त १:४५ मिनिटे चालू शकले.

आयोगाकडून हेतुपुरस्सर फेरफार : राहुल गांधी
बिहार आणि कर्नाटकमधील मतदार याद्यांमध्ये हेतुपुरस्सर फेरफार केले जात असल्याचा गंभीर आरोप करत लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भारतीय निवडणूक आयोगाला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेवरून विरोधी पक्षांचे आंदोलन सुरू असताना, राहुल गांधी यांनी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दांत आयोगाला जबाबदार धरण्याचा निर्धार व्यक्त केला. संसदेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. मला निवडणूक आयोगाला एक संदेश द्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यातून सहीसलामत सुटाल, तर तो तुमचा गैरसमज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR