बीड : राज्यामध्ये सर्वदूर पावसाने हाहाकार माजवला आहे. याचा फटका बीड जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. बीड जिल्ह्यामध्ये १७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तीन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये सोयाबीनसह कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून बीड जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यात अकरा तालुक्यांमध्ये अधिक पाऊस झाला असून अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून पिके देखील पाण्याखाली गेले आहेत. याचा परिणाम आता उत्पादनावर होणार आहे.
तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
दरम्यान नुकसानीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित महसूल मंडळ आणि जिल्हाधिका-यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासोबतही या संदर्भात माहिती विचारून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत; अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
सोयाबीनचे नुकसान
अमरावती जिल्ह्यात संततधार पावसामुळे सोयाबीन पीक सडायला लागले आहे. तर तिवसा तालुक्यासह अनेक भागात सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. यलो मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडले आहे. तर दुसरीकडे जमिनीत क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने पिके सडली असल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीन खराब झाले आहे. तर सततच्या पावसामुळे सोयाबीनसह कपाशी, उडीद, मूग पिकालाही मोठा फटका बसला आहे.

