बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाण्यात वाहून गेलेल्या जिगाव आंदोलनकर्त्याचा मृतदेह १४ किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीत आढळून आला आहे. मृत्यूमुळे नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. जलसमाधी आंदोलनावेळी वाहून गेलेल्या विनोद पवार यांचा मृतदेह ४४ तासानंतर पूर्णा नदीत आढळला. शनिवारी (ता. १६) संध्याकाळी साडेसात ते सात वाजण्याच्या सुमारास पवार यांचा मृतदेह नदीत गाळात फसलेला आढळला.
मृत विनोद पवार यांच्या पत्नीने सांगितले की, घटनेमध्ये जिल्हा प्रशासनाची निष्काळजीपणा हा प्रमुख कारण आहे. तिने प्रशासनावर दोषारोप करत सांगितले की, अद्याप त्यांच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. या घटनेतील मृतकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलन स्थळापासून १४ किलोमीटर अंतरावर, धुपेश्वरजवळील पूर्णा नदीच्या पात्रात पवार यांचा मृत्यू झाला. पुनर्वसित गावातील नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी जिगाव प्रकल्पानजिक पूर्णा नदीवर जलसमाधी आंदोलन केले होते. या आंदोलनाचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीबाबत निषेध नोंदवणे आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधणे होते. आडोळ खुर्द गावाचा जिगाव प्रकल्पात पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात समावेश झाला होता, मात्र नागरिकांना अद्याप जागा आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही. याच कारणास्तव स्थानिक नागरिकांनी हे आंदोलन केले.
विनोद पवारच्या जलसमाधी आंदोलनानंतर परिसरात शोक पसरला आहे. घटनेसाठी जिल्हा प्रशासन जबाबदार आहे. मृतकाच्या कुटुंबाला अद्यापपर्यंत तातडीची आर्थिक मदत किंवा प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याच्या आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

